१३ कोटी खर्चून बांधलेल्या नवीन बसस्थानकाला उद्घाटनाआधीच गळती

१३ कोटी खर्चून बांधलेल्या नवीन बसस्थानकाला उद्घाटनाआधीच गळती

१३ कोटी खर्चून बांधलेल्या नवीन बसस्थानकाला उद्घाटनाआधीच गळती — पालकमंत्री अजितदादा पवार व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना लेखी तक्रार; डॉ. गणेश ढवळे यांचा आंदोलनाचा इशारा

बीड – प्रतिनिधी(दि.०१ )

तब्बल १३ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेले बीडचे नवीन बसस्थानक उद्घाटनाआधीच गळतीला लागले असून, प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसात स्थानकाच्या छपरातून अनेक ठिकाणी पाणी गळत होते, त्यामुळे प्रवाशांना छत्री घेऊन बसस्थानकात उभे राहावे लागले.

जून २०२५ मध्ये हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते, मात्र अद्याप अनेक कामे अपूर्ण असून प्रवाशांना सतत गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. परिसरात स्वच्छतेचा पूर्ण अभाव आहे; शौचालय बांधले असले तरी ते पत्रे लावून बंद ठेवण्यात आले आहेत. तसेच बसस्थानक परिसरात पथदिवे बंद असुन योग्य प्रकाश व्यवस्था नसल्याने रात्री अनुचित घटना घडल्याचेप्रकार आढळून आले आहेत.

गुत्तेदाराने निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्यामुळे बसस्थानकाचे छप्पर आणि पत्रे उघड्यावर आले आहेत. संबंधित विभागीय नियंत्रक व अभियंत्यांनी याकडे लक्ष न दिल्याचे स्पष्ट होत असून, गुणनियंत्रक विभागामार्फत चौकशी करून दोषींवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख, बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केली आहे. त्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजितदादा पवार आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना लेखी तक्रार सादर करून आंदोलनाचा इशारा दिला आहे.

“पालकमंत्री अजितदादांनी कंत्राटदारांना ब्लॅकलिस्ट करावे” — डॉ. गणेश ढवळे

अजितदादा पवार यांनी बीड दौऱ्यावर असताना “कामाचा गुणवत्ता दर्जा उत्कृष्ट असला पाहिजे, निकृष्ट काम करणाऱ्यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात येईल” असा इशारा दिला होता. मात्र, एवढ्या कोटींचा खर्च करून बांधलेल्या बसस्थानकात उद्घाटनाआधीच गळती लागल्याने, पालकमंत्र्यांनी ठोस निर्णय घेऊन दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी डॉ. गणेश ढवळे यांनी केली आहे

“दोन वेळा भूमिपूजन करून श्रेय घेणारे नेते आता गप्प”

 

बीडच्या मध्यवर्ती बसस्थानकासाठी निधी आणल्याचे सांगत दोन वेळा भूमिपूजन करून पत्रकबाजी करणारे नेतेमंडळी, आता या निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत मूक-बधिर बनले आहेत, अशी संतप्त प्रतिक्रिया डॉ. गणेश ढवळे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *