परळीतून जावयाला उमेदवारी मागे घ्यायला लावा, अन्यथा परिणाम…. गंगाखेडचे उमेदवार रत्नाकर गुट्टे यांच्यावर समाज माध्यमांमधून दबाव!
अनेक पोस्ट व्हायरल, काही मुंडे प्रेमींचे थेट रत्नाकर गुट्टे यांना मेसेज
गंगाखेड (दि.01) – सध्या भाजप व महायुतीचे गंगाखेड विधानसभेचे उमेदवार रत्नाकर गुट्टे समाज माध्यमांवर एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहेत. त्यांचे जावई असलेले राजाभाऊ फड यांनी परळीत कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या स्पर्धेत भरलेला अर्ज मागे घ्यायला लावा, अन्यथा त्याचा रोष रत्नाकर गुट्टे यांना गंगाखेड विधानसभा निवडणुकीत सहन करावा लागेल, अशा पद्धतीचा दबाव समाज माध्यमांवरून रत्नाकर गुट्टे यांच्यावर आणला जात आहे.
रत्नाकर गुट्टे यांचे जावई व त्यांच्या मर्जित असलेले राजाभाऊ फड यांनी परळी विधानसभेची शरद पवार गटाने उमेदवारी नाकारल्यानंतर अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. राजाभाऊ फड हे एकेकाळचे मुंडे प्रेमी व भाजप-रासपचे कार्यकर्ते होते. मात्र एकीकडे धनंजय मुंडे यांना मोठ्या नेत्यांकडून व्युहरचना करून टार्गेट केले जात असताना राजाभाऊ फड यांची उमेदवारी ही काही ओबीसी व त्यातल्या त्यात वंजारी समाजाच्या मतांचे विभाजन करणारी ठरू शकते.
त्यामुळेच परळीला लागूनच असलेल्या गंगाखेड मतदारसंघातील अनेक मुंडे प्रेमी सोशल मीडियावर पेटून उठले असून, त्यांनी रत्नाकर गुट्टे यांच्या वर दबाव आणायला सुरुवात केली आहे.
रत्नाकर गुट्टे यांना दिवंगत भाजप नेते गोपीनाथराव मुंडे व आ.पंकजाताई मुंडे यांचे कायम सहकार्य लाभल्याने ते तुरुंगात असताना सुद्धा मागच्या वेळी निवडून आले.
गंगाखेड मतदारसंघात निर्णायक मतदान हे ओबीसी समाजाचे असून, येथून डॉ.मधुसूदन केंद्रे, रत्नाकर गुट्टे असे आमदार विजयी झाले ते मुंडे कुटुंबाला मानणाऱ्या मतदारांमुळे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. गंगाखेड मध्ये मोठ्या प्रमाणावर मुंडे कुटुंबाला मानणारा वर्ग असून मुंडे कुटुंब म्हणतील त्याप्रमाणे इथल्या आमदारकीचे गणित ठरते, असेही मानले जाते.
‘सन्माननीय रत्नाकर गुट्टे साहेब,
आज पंकजाताई मुंडे यांच्या पराभवानंतर मुंडे कुटुंब राजकीय अडचणीत असताना तुमचे जावई राजाभाऊ फड हे मुंडे प्रेमींचे व्हिलन ठरून धनंजय मुंडे यांच्या विरोधात लढण्याचा हट्ट धरून बसले आहेत. त्यांना उमेदवारी मागे घ्यायला लावा, अन्यथा गंगाखेड मध्ये तुम्हाला आमच्या व ओबीसी समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागेल, त्याचा फटका तुम्हाला मतपेटीतून दिसेल, त्यामुळे राजाभाऊ फड यांना उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावा.’ अशा आशयाचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत असून, बऱ्याच नेटिझन्सनी थेट रत्नाकर गुट्टे यांना सुद्धा हे मेसेज पाठवले आहेत.
दरम्यान रत्नाकर गुट्टे आपल्या जावयाची समजूत काढणार की जावयासह स्वतः देखील वंजारी समाजाचे व मुंडे प्रेमींचे व्हिलन ठरणार? हा प्रश्न आता ऐरणीवर आला असून गुट्टे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


2 Comments