साहित्य क्षेत्रात अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा-अजिंक्य चांदणे
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा सन्मान करण्याची डेमोक्रॅटिक पार्टीची मागणी यशस्वी
बीड अक्षरधाम प्रतिनीधी
दिल्ली येथे 21 ते 23 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा योग्य सन्मान व्हावा, यासाठी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाने घेतलेला संघर्ष यशस्वी ठरला आहे. असे डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र अध्यक्ष अजिंक्य चांदणे यांनी हॉटेल नीलकमल येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले आहे. यावेळी उपस्थित उत्तम पवार,सुभाष लोणके, नवनाथ कांबळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. या संदर्भात पक्षाच्या शिष्टमंडळाने डिसेंबर महिन्यात संमेलनाचे स्वागताध्यक्ष मा. शरदचंद्र पवार यांची भेट घेतली. तसेच, साहित्य मंडळ, पुणे यांना निवेदन सादर करून अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा उचित सन्मान व्हावा, अशी मागणी करण्यात आली होती.त्यानंतर, डेमोक्रॅटिक पार्टीने महाराष्ट्रभर व्यापक चळवळ उभी करत सातारा, कोल्हापूर, सांगली, बीड, वाशिम, लातूर, जालना, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा आदी जिल्ह्यांमध्ये आंदोलने केली. संबंधित जिल्हाधिकाऱ्यांमार्फत साहित्य मंडळाला निवेदने देण्यात आली. या चळवळीला मिळालेला प्रतिसाद आणि पाठपुराव्याच्या जोरावर अखेर साहित्य मंडळाने अण्णाभाऊ साठे यांचा सन्मान केला जाईल, असे लेखी आश्वासन दिले.या यशस्वी लढ्याच्या निमित्ताने डेमोक्रॅटिक पार्टीने पत्रकार परिषद घेऊन साहित्य मंडळ आणि शरद पवार यांचे आभार व्यक्त केले. तसेच, ही चळवळ यशस्वी करणाऱ्या सर्व अण्णाभाऊ साठे अनुयायांचे व पक्ष पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

